
महापौर दीपमाला काळे यांनी केली पाहणी
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत येणाऱ्या महामार्गालगतच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून वाहनधारकांना होणाऱ्या त्रासातून लवकरच सुटका होणार आहे. खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या ठिकाणी गटारीच्या कामाला सुरुवात झाली आहे.


महामार्गालगत साचणाऱ्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण सुचनांची दखल घेत, प्राधिकरणाने आता अग्रवाल हॉस्पिटल चौफुली ते शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पर्यंत खड्डे खोदून गटारीचे काम सुरू केले आहे. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता थेट गटारीतून वाहून जाईल.
महापौरांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी
या सुरू असलेल्या कामाची पाहणी महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली. या पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राहुल पाटील, आशिष कासट आणि कंत्राटदार कृष्णा मुरारी मिश्रा उपस्थित होते. त्यांनी महापौरांना सुरू असलेल्या कामाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती दिली. पावसाळ्यात नागरिकांना व वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेता, हे काम अत्यंत दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून जळगावकर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशा कडक सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला दिल्या.









