

अडावद (वार्ताहर) शेताचा बांध कोरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकारची घटना चोपडा तालुक्यातील वढई येथे घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एकूण ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील परशुराम सुलतान (वय ५२, रा. वढई, ता. चोपडा, जि. जळगाव) हे दि. ०२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास वढई गावातील ताराचंद नगर भागात असताना, शेताचा बांध कोरण्याच्या जुन्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या वादात संशयित आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील संशयित आरोपी क्रमांक ३ याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात सुनील सुलतान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात दि. ०४ जुलै २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहेत यात १) सुभाष अर्जुन बडगुजर,२) राजेंद्र सुभाष बडगुजर, ३) गोविंद सुभाष बडगुजर,४) बेबोबाई सुभाष बडगुजर,५) ज्योत्स्ना गोविंद बडगुजर, ६) रतीलाल अर्जुन बडगुजर,७) बाळू रतीलाल बडगुजर, ८) ज्ञानेश्वर आधार बडगुजर (सर्व रा. वढई, ता. चोपडा, जि. जळगाव)
या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रशांत मधुकर कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
—







