काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; डिझेल टंचाई, खत दरवाढ आणि वीज कपातीवर संताप
जळगाव ( प्रतिनिधी ) – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, डिझेल टंचाई, खतांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांना दिला जाणारा वीज पुरवठा ८ तासांवरून ६ तासांवर आणण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


ग्रामीण काँग्रेस पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी आणि शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल ८ रुपयांची वाढ झाल्याने आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर आणखी आर्थिक भार पडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील करातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला असून, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ तातडीने मागे घेऊन इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही निवेदनात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने २५ मे ते १५ जूनदरम्यान शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी ६ तास वीज देण्याचा निर्णय घेतल्याने केळी बागांसह विविध पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षात अनेक भागात ५ तासही नियमित वीज मिळत नसल्याचा आरोप करत पूर्ववत ८ तास वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
डिझेलअभावी ट्रॅक्टरची कामे खोळंबत असून शेतकऱ्यांना तासन्तास पेट्रोल पंपांवर थांबावे लागत आहे. त्यातच रासायनिक खतांचे वाढलेले दर, उष्णतेची लाट आणि वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डिझेल पुरवठा नियमित करणे, खतांचे दर नियंत्रणात आणणे आणि वीज पुरवठा पूर्ववत करणे आवश्यक असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे स्पष्ट केले आहे.








