झुलेलाल मानव सेवा संस्थेचा आरोपांना चोख प्रत्युत्तर
जळगाव ( प्रतिनिधी ) – “धार्मिक यात्रेचा मुख्य उद्देश चंदा गोळा करणे नसून समाजाला संघटित करणे हा होता. यात्रेदरम्यान जमा झालेल्या मर्यादित निधीतून भव्य जमीन खरेदी करणे अशक्य असतानाही, आम्ही टप्प्याटप्प्याने हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचे काम मार्गी लावत आहोत,” असा स्पष्ट खुलासा झुलेलाल मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष निरज जेस्वानी यांनी केला.


शहरातील धार्मिक यात्रेच्या निधीवरून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी यात्रेचा हिशोब आणि भविष्यातील नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
निधीचा तपशील आणि कामाचा आढावा
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान जमा झालेली रक्कम रोख स्वरूपात: ११ लाख ५० हजार रुपये, ऑनलाइन स्वरूपात: १ लाख ९४ हजार रुपये आहे. या निधीबाबत बोलताना जेस्वानी म्हणाले की, इतक्या कमी रकमेत सहा एकर जमीन खरेदी करणे शक्य नाही, तरीही संस्थेने स्वप्रयत्नातून १७ फेब्रुवारी २०२१ रोजी मंदिरासाठी सहा एकर जमीन खरेदी केली.
तत्पूर्वी २६ डिसेंबर २०१९ रोजी यात्रा संपल्यानंतर १ फेब्रुवारी २०२० रोजी भूमिपूजन करण्यात आले होते, मात्र कोरोना संकटामुळे कामात अडथळे आले. मूर्तीचे काम निधीअभावी थांबवावे लागल्यानंतर, कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी संस्थेने महत्त्वाचा निर्णय घेतला. ऑगस्ट २०२१: तीन एकर जागेवर ‘झुलेलाल वॉटर पार्क रिसॉर्ट’ उभारण्याचा निर्णय.
मे २०२३: वॉटर पार्कचे काम पूर्ण.
उद्देश: वॉटर पार्कच्या उत्पन्नातून मंदिराचे उर्वरित बांधकाम पूर्ण करणे.
“मंदिरात कोणतीही दानपेटी नसेल” विशेष म्हणजे, हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचा चंदा घेतला जाणार नाही किंवा दानपेटी ठेवली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. काही घटकांकडून हेतुपुरस्सर संस्थेची आणि समाजाची बदनामी केली जात असल्याचा आरोप जेस्वानी यांनी केला. “ज्यांनी पैसे दिल्याचा दावा केला आहे, त्यांनी पुराव्यासह समोर यावे,” असे आवाहन त्यांनी दिले. तसेच, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची नावे योग्य वेळी जाहीर केली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आर्थिक मर्यादांमुळे मंदिर उभारणीचे काम थांबले नसून ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याच्या जिद्दीवर संस्था ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









