दोन दिवसांची वन कोठडी
यावल (प्रतिनिधी):- सातपुड्याच्या संरक्षित वनक्षेत्रात वनवा लावणाऱ्या एका आरोपीला वन विभागाने रंगेहाथ पकडले असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जंगलात आग लावण्याच्या घटना समोर येत असताना वन विभागाने केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

रविवार, दि. १५ मार्च रोजी वाघझिरा राउंड स्टाफला गुप्त माहिती मिळाली होती की, मनूदेवी कक्ष क्र. ४४९ या भागात काही ठिकाणी वणवा लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे राज्या सखाराम बारेला (रा. झेंडी, ता. यावल) हा व्यक्ती प्रत्यक्ष आग लावताना पथकाच्या निदर्शनास आला. वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.
आरोपीने राखीव जंगलात आग लावून वनसंपदेचे नुकसान केल्याबद्दल त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) ब आणि ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दि. १६ मार्च रोजी आरोपीला यावल येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट वर्ग-१ यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला बुधवार दि. १८ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक (जळगाव) सौरिश सहाय, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (यावल पश्चिम) प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात विपुल दि. पाटील (वनपरिमंडळ अधिकारी, वाघझिरा), हनुमंत सोनवणे (वनरक्षक, मनूदेवी), अशोक राठोड, चेतन शेलार, जगदीश बारेला व वनसेवक या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जंगलात आग लावणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे नैसर्गिक संपत्तीचे आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होते. वन विभागाने नागरिकांना असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.









