शिरसोली ( वार्ताहर ) – येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे, प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय संचालक व खजिनदार कमलाकर तांदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, संचालक शशिकांत वाणी, प्रवीण पाटील, उमाकांत बारी, भास्कर बारी, अशोक काटोले, राजेश आंबटकर, अशोक अस्वार, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, भरत बारी, संजय काटोले यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करून चांगले गुण मिळवून आई-वडिलांचे व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. चुकीच्या मार्गाला जाऊ नका, असा सल्ला दिला.
अध्यक्ष निलेश खलसे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत नागरिक होण्याचे आवाहन केले. “मी देखील या विद्यालयाचा विद्यार्थी असून आज अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. भविष्यात तुम्हीही मोठे होऊन या विद्यालयात प्रमुख अतिथी म्हणून याल,” असे त्यांनी सांगितले.
निलेश खलसे यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा व मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. भविष्यात आणखी शाळा नाव-रूपाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी केले. आभार प्रदर्शन सुनील भदाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.









