शाखेच्या बैठकीत विविध उपक्रमांवर झाली चर्चा
जामनेर (प्रतिनिधी) – येथील सुपारी बाग परिसरात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या शाखेच्या बैठकीत आगामी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.



कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा महिला सहभाग विभागाच्या शोभा बो-हाडे यांनी चळवळीचे गीत सादर केले. त्यानंतर विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, सुरक्षारक्षक विदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा बुवाबाजी संघर्ष विभागाचे भिमराव दाभाडे यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे व शाखा कार्याध्यक्ष बी. आर. पाटील यांनी संत रविदास महाराजांच्या विचारांचे महत्त्व विशद करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमात नागनंदा मघाडे यांनी भारतीय संविधानाची माहिती देत नागरिकांचे हक्क व कर्तव्ये स्पष्ट केली. आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन आणि जागतिक महिला दिवसानिमित्त करावयाचे उपक्रमांची प्राथमिक चर्चा करण्यात आली.
यावेळी शंकर भामेरे यांच्या ‘जागर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन व त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संविधान कार्यकर्त्या नागनंदा मघाडे यांचा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रामदास सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास रमेश गायकवाड, निवृत्ती चौधरी, तिर्थराज सुरवाडे, बापूसाहेब सुरवाडे, आशिष दाभाडे, स्वप्निल खरे, वर्षा बाविस्कर, प्रतिभा नरवाडे, सरस्वती बाविस्कर, कमल गायकवाड, ऊषा तायडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









