चाळीसगाव तालुक्यात खळबळ
चाळीसगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील भौर येथील एका २१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत, अंगावर डिझेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चेतन दीपक पाटील (वय २१, रा. भौर) याचे एका आरोपीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हा वाद झाला. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री १०:१० वाजेच्या सुमारास, चेतन हा भौर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असताना आरोपींनी त्याला दुचाकीवर बळजबरीने बसवून पळवून नेले. संशयित आरोपींनी चेतनला जामदा स्टेशनजवळील रेल्वे रुळावरून सतीश पाटील यांच्या शेतात नेले. तिथे आरोपींनी त्याला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी सतीश पाटील याने चेतनच्या उजव्या पायावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. इतक्यावरच न थांबता, सोनू पाटील आणि कैलास नावाच्या आरोपींनी चेतनच्या अंगावर डिझेल ओतले आणि ‘याला जाळून टाका’ असे म्हणत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी चेतन पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे साई सतीश पाटील, सोनू राजेंद्र पाटील, मोनू राजेंद्र पाटील, सुमित भिल्ला जाधव (सर्व रा. भौर),कैलास (पूर्ण नाव माहित नाही, रा. कुंजर), सतीश पाटील (रा. भौर) घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत. सध्या सर्व आरोपींचा शोध सुरू असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.









