तांत्रिक मुद्द्यांवर वैशाली पाटील यांचा अर्ज बाद
जळगाव विशेष प्रतिनिधी
येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाचा श्री गणेशा केला आहे. जळगाव भाजपाच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे या प्रभाग क्रमांक १२ ब मधून अखेर बिनविरोध झाले असून त्याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जितेंद्र कुंवर यांनी केली.आहे.


प्रभाग क्रमांक १२ मध्ये महायुती मधून भारतीय जनता पक्षाला चारही जागा मिळालेले आहेत. यात १२ मध्ये अ मधून अनिल अडकमोल, १२ ब मध्ये उज्वलाताई मोहन बेंडाळे, १२ क मधून गायत्री इंद्रजीत राणे, १२ ड मध्ये नितीन मनोहर बरडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. दरम्यान बुधवारी दि. ३१ डिसेंबर रोजी महानगरपालिकेमध्ये दिवसभर छाननीचे काम सुरू होते.
या छाननीअंती प्रभाग क्रमांक १२ ब मध्ये वैशाली निवृत्ती पाटील यांनी भारतीय जनता पक्षातर्फे तीन अर्ज भरले होते. मात्र कुठल्याही उमेदवाराला एकाच प्रभागात ३ अर्ज भरता येत नाही. तसेच भारतीय जनता पक्षाने वैशाली पाटील यांना एबी फॉर्म दिलेल्या नाही. तसेच वेळेच्या तांत्रिक मुद्द्यावर त्यांचा ब आणि ड मधील अर्ज बाद झाला.

त्यामुळे १२ ब मध्ये उज्वलाताई मोहन बेंडाळे या आता एकमेव उमेदवार आहेत. त्यांची बिनविरोधीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री कुंवर यांनी केली. तर वैशाली निवृत्ती पाटील यांचा १२ क मध्ये अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून भाजपच्या गायत्री राणे यांच्या विरोधात लढतील. दरम्यान उज्वलाताई बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.








