कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर संस्थानचा 153 वा पारंपरिक रथोत्सव भव्य सजावटीसह उत्साहात
जळगाव प्रतिनिधी – सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रविवारी कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त 153 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला श्रीराम रथोत्सव दिमाखात पार पडला. दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी ‘जय श्रीराम’च्या घोषात आणि शंखनाद, चौघड्यांच्या गजरात रथ हलल्यानंतर संपूर्ण जळगाव नगरी भक्तिभावाने दुमदुमून गेली.
फुलांनी सजलेलं मंदिर, फुलांचा वर्षाव
यंदा प्रथमच श्रीराम मंदिराची सजावट तब्बल तीन क्विंटल झेंडू, एक टन शेवंती आणि गुलाबफुलांनी करण्यात आली. रथाच्याही सजावटीसाठी दोन क्विंटल फुलांचा वापर झाला तर रथमार्गावर तब्बल 14 क्विंटल फुलांची उधळण करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांचा वापर दोन क्विंटलने अधिक झाला असल्याचे संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले. मंदिर, रथ आणि मार्ग अशा सर्वत्र 20 क्विंटल फुलांचा वापर करून यंदाचा रथोत्सव अधिक देखणा आणि आकर्षक झाला होता.
विधिवत पूजन आणि भव्य मिरवणूक
सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात, ब्राह्मणवृंदांच्या वेदमंत्रोच्चारात देवादिकांच्या हस्ते रथाचे पूजन, रथचक्राचे पूजन आणि कोहळे अर्पण विधी पार पडले. त्यानंतर श्रीराम महाराजांच्या हस्ते महापूजन होऊन रथ ओढण्यास सुरुवात झाली. “सियावर रामचंद्र की जय”, “जय श्रीराम”, “प्रभू रामचंद्र की जय” या घोषात वातावरण दुमदुमून गेलं. रथ मार्गावर सहा किलोमीटरपर्यंत भक्तांनी फुलांची उधळण करत प्रभू श्रीरामांचे स्वागत केले.
आकर्षक सजावटीने वेधले लक्ष
प्रभू श्रीरामांच्या रथाला भगवे ध्वज, झेंडू-शेवंतीच्या माळा, आंबा-नारळाची तोरणं, केळीचे खांब, उसाच्या मोळ्या आणि आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. रथाचा प्रत्येक भाग — चाकापासून ते कळसापर्यंत — फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघाला होता. या देखण्या रथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला रथोत्सव
हा रथोत्सव केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक सलोख्याचेही प्रतीक आहे. यावेळी मुस्लिम बांधवांनी रथावर फुलांची उधळण करून स्वागत केले, तर हिंदू बांधवांनी दर्ग्यावर चादर चढवून बंधुतेचा संदेश दिला. त्यामुळे 153 वर्षांची ही अखंड परंपरा यंदाही ऐक्य, भक्ती आणि आनंदाचा संदेश देत सुवर्णनगरीला राममय करून गेली.









