कासमवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय-२७ रा. कासमवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना याचे घरासमोर राहणाऱ्या काही तरुणांशी जुना वाद होता. शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना त्याच्या घरासमोर राहणाऱ्या दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना हा गंभीर जखमी झाला.
या घटनेत नाना उर्फ ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला मित्रांनी तातडीने दुचाकी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात खुनाचे सत्र नियमित सुरू असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.