

जळगाव ( प्रतिनिधी) – शहरातील असोदा रेल्वेउड्डाण पुलाच्या खाली धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मयत हे वाल्मीक नगर मधील रहिवासी असल्याचे सकाळी समजले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय-५५, रा. वाल्मीक नगर, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहितीनुसार, ज्ञानेश्वर पाटील हे वाल्मीक नगरात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. रिक्षा आणि खाजगी कंपनीत काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सोमवारी रात्री ते घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मयत हे ज्ञानेश्वर पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन ओळख पटवली. दरम्यान सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.









