स्नेहमेळाव्यात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती
नाभिक समाज महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर वाघ, सचिन सोनवणे यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) :- शासनाच्या उदासीन धोरणांमुळे बारा बलुतेदार समाजाचा विकास खुंटला असून, शासनाने सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या घोषणा केवळ पोकळ ठरल्या आहेत, अशी खंत नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी व्यक्त केली. शासनाकडून निधी नाकारला जात असल्यामुळे ही समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव येथे आयोजित नाभिक समाज स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश सचिव पांडुरंग भंवर, महिला प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सलोने, किशोर सुर्यवंशी, सुनिल बोरसे, रविंद्र शिरसाठ, मावळते अध्यक्ष रविंद्र नेरपगार, उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, चंद्रकांत शिंदे, उमाकांत निकम, प्रशांत बाणाईत, सचिव संजय पवार उपस्थित होते. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी स्नेह मेळाव्याचे उद्घाटन केले.
याप्रसंगी नाभिक महामंडळाच्या नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम विभागासाठी किशोर मधुकर वाघ आणि पूर्व विभागासाठी सचिन सोनवणे यांची निवड करण्यात आली. तसेच, कार्याध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे आणि सरचिटणीसपदी संजय पवार यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी राज्यध्यक्ष कल्याणराव दळे याच्या हस्ते किशोर सैंदाणे, उपसंपादक सतिष बोरसे, पत्रकार संजय पवार, अँड. भरत ठाकरे, होमगार्ड लिपिक हिलाल नेरपगारे, संजय वखरे, हभप सरला वाघ, देवराव वाघ, पुण्याशोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार भारतीताई सोनवणे यांच्यासह मावळते जिल्हाअध्यक्ष रविंद्र नेरपगार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना कल्याणराव दळे यांनी, सर्व पोटजाती बाजूला ठेवून ‘नाभिक’ या एका छत्राखाली एकत्र येऊन समाजहिताचे काम करण्याचे आवाहन केले. समाजाच्या विकासासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’सारख्या संस्थांना अपुरा निधी दिला जात असल्याची टीकाही दळे यांनी केली. तसेच, अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्र भूषण पुरस्कार संत सत्यपाल महाराज यांना देण्याची मागणी शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
सूत्रसंचालन ह.भ.प. मनोहर खोंडे यांनी केले तर आभार अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश वाघ, अरुण श्रीखंडे, जगदीश निकम, गणेश सानवणे, भरत चव्हाण, प्रशांत बाणाईत, भिकन बोरसे, अभय सुर्यवंशी, नरेश गर्गे, पंडीत संनासे, शांताराम सोनगिरे, उदय सोनवणे, वसंतराव साळुंखे, शिवाजी निकम, किरण नांद्रे, कैलास वाघ, आत्माराम शिंदे, विशाल निकम यांनी परिश्रम घेतले.