शहरातील न्यू जोशी कॉलनी परिसरात घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सम्राट कॉलनी येथील रहिवासी तरुणाची जुन्या वादातून चाकूने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना रविवार दि. २७ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला असून या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे.
धीरज दत्ता हिरवाडे (वय २४, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील व बहीणसह राहत होता. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे काही तरुणांसोबत वाद होते.(केसीएन)या वादातून रविवारी दि. २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता न्यू जोशी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ धीरज व मारेकरी तरुणासह वाद झाले. या वादात धीरजला छातीवर, चेहऱ्यावर, डाव्या हातावर गंभीर वार झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. धीरज हिरवाडे याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांसह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळी चॉपरचे पाते आढळून आले आहे. दरम्यान, या घटनेमध्ये कल्पेश भटू चौधरी (वय २३, रा.सम्राट कॉलनी) हा देखील गंभीर जखमी झाला आहे.
घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी देखील धीरज याला मारहाण झाली होती. आता पुन्हा जुना वाद उफाळून आला. त्यात आता धीरजची हत्याच झाली आहे. त्यामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.