पंढरपूर वारीचे मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते उद्घाटन
चाळीसगांव (प्रतिनिधी) – चाळीसगाव ते पंढरपूर विठाई एक्स्प्रेस या विशेष रेल्वेच्या माध्यमातून ४ हजाराहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाली. त्याप्रसंगी वारीच्या प्रस्थान सोहळ्यास राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पालखीला खांदा दिला. तसेच विशेष रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून पंढरपूर कडे रवाना केले.

यावेळी खा. स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, नाशिक भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्यामकांत सोनवणे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण हे जरी माझ्यापेक्षा वयाने लहान असतील तर त्यांच्या अनेक कामांचा हेवा मला वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे नियोजनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने वारीचे महात्म्य जवळून अनुभवत आहे. पंढरपूरची वारी एक चांगला उपक्रम असून मी देखील माझ्या मतदारसंघातील वारकऱ्यांना पुढील आठवड्यात विशेष पंढरपूर दर्शन घडवणार आहे. खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश चव्हाण व त्यांचं काम असल्याचेही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी या नात्याने विकास कामे होत राहतील मात्र पंढरपुर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन वारकऱ्यांना करून आणणे ही माझ्यासाठी जीवनात महत्त्वाची बाब असल्याची भावना आ. मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तालुक्यातील मायबाप जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, ही वारी ही कुटुंबाची वारी आहे. वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडवून आणणे ही सेवा असून या सेवेतूनच खर विठ्ठलाचे दर्शन होत असल्याचे यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
पंढरपूर येथे चाळीसगाव मतदारसंघातून गेलेल्या ४ हजार भाविकांच्या दोन वेळा जेवणाची व्यवस्था श्री शनी महाराज मठ येथे करण्यात आली आहे, चाळीसगाव हुन पंढरपूर जाताना व पंढरपूरहुन चाळीसगाव येताना रेल्वे मध्ये जवळपास १२ हजार पाणी बॉटल्स, औषधोपचार पेटी आदी अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. भाविकांची वारी सुखकर व निरोगी व्हावी यासाठी संपूर्ण काळजी घेण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून भाजपा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.









