जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन
जळगांव (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांनी नवनविन तत्रज्ञानाची कास धरत शेतीत नविन प्रयोग करून प्रयोगशीलता अंगीकारली पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतः निर्यातक्षम बनले पाहिजे. रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, गट विकास अधिकारी श्वेता पालवे, बंजारा टायगर्स संघटनेचे अध्यक्ष आत्माराम जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले.
या वेळी प्रगतीशील शेतकरी, शेती क्षेत्रात विविध प्रयोग करणारे शेतकरी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले कि, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्वाचा वाटा आहे.देशाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. राज्यात एमआयडीसीचे जाळे विस्ताररण्यात देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शेती क्षेत्रातील सुधारणाचे जनक म्हणून देखील त्यांचेकडे बघितले जाते. म्हणूनच वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते, असेही ते म्हणाले.