यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात घटना
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील सावखेडासिम जवळ असलेल्या निंबादेवी धरणात अंघोळीसाठी गेलेल्या ८ तरुणांपैकी जळगाव शहरातील १८ वर्षीय तरुण खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. दुसऱ्या एका तरुणाचा मात्र थोडक्यात जीव वाचवण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली असून पोलीस घटनास्थळी तरुणाचा शोध घेत आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, गेंदालाल मिलमधील ८ तरुण सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी निंबादेवी धरणावर गेले होते. तेथे अंघोळ करताना जतीन अतुल वारडे (वय १८) हा खोल पाण्यात गेला आणि बुडाला.(केसीएन)त्याच्यासोबत आणखी एक तरुण देखील बुडू लागला होता. मात्र, इतर तरुणांनी तत्काळ मानवी साखळी तयार करून त्याला केसांना धरून बाहेर ओढून वाचवले.
घटनेची माहिती पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसांना दिल्यानंतर सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.(केसीएन)अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरण परिसरात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते. तसेच त्या भागातील रस्त्यांची अवस्था वाईट असून अपघाताचा धोका अधिक आहे. नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.