पोलीस अधीक्षकांकडून विशेष तपास पथकाची घोषणा
जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या निर्घृण खुन झाल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास आता जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आता ग्रामस्थांनी नरबळीची शक्यता वर्तवल्याने जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत कलम वाढवण्यात आले आहे.
मयत तेजस महाजन याच्या वडिलांनी गजानन नामदेव महाजन (वय ४५) यांनी मुलाचा नरबळी दिल्याची शक्यता व्यक्त केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. दिनांक १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रिंगणगावातील राहत्या घरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, गावाबाहेरील रोडजवळील एका पडक्या शेतात काटेरी झुडपात मुलाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची तपासणी केली असता, धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले. यानंतर १७ जून २०२५ रोजी गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ६१ (२), १४० (१), ३ (५) वाढवण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तीन पथकांनी २४ तासांच्या आत तपास करत दोन फरार आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून तिसरा आरोपी, २० वर्षीय रिचडीया तुकाराम कोठवले याचे नाव समोर आले. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासणीत हा आरोपी रिंगणगाव परिसरात नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, फिर्यादीच्या पुरवणी जबाबानुसार, त्यांच्या शेतात काम करणारा कामगार, सुरेश वारसिंग बारेला (वय २५) हा कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलासोबत दिसल्याने त्याच्या सहभागाची शक्यता वर्तवण्यात आली. त्याला २५ जून २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, तो सध्या १ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत आहे.
दरम्यान तेजसच्या नातेवाईकांनी वारंवार नरबळीची शक्यता व्यक्त केल्याने, २४ जून २०२५ रोजी या गुन्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) नुसार वाढ करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य आणि जनभावना लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी फिर्यादी आणि रिंगणगावच्या स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या:
१. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा.
२. गुन्ह्यात नरबळीचे कलम वाढवून त्याप्रमाणे तपास करण्यात यावा.
३. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित कामगाराला आरोपी करण्यात यावे.
४. सरकारी अभियोक्ता म्हणून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.
५. सदर गुन्ह्याचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा.
यापैकी पहिल्या तीन मागण्या यापूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन मागण्यांसाठी पोलीस प्रशासन शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
विशेष तपास पथकाची रचना
डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी मध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
*कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव (पर्यवेक्षण अधिकारी)
* विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग (तपास अधिकारी)
* जितेंद्र वल्टे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव (सहायक तपास अधिकारी)
*संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव (सदस्य)
*निलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक, एरंडोल (सदस्य)
* पोना सचिन पाटील, एरंडोल पोलीस स्टेशन (सदस्य)
* पोशि राहुल कोळी, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव (सदस्य)
या विशेष पथकाद्वारे या गुन्ह्याचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.