महाराष्ट्र अंनिसची जिल्हा बैठक जामनेर येथे उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाखांवरती सातत्याने सक्रिय राहणे आवश्यक आहे. समितीच्या आयोजित होणाऱ्या शिबिरांना आणि शाखा भेटींना कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक जामनेर येथे छत्रपती शिवाजीनगर येथे पार पडली बैठकीला निरीक्षक म्हणून समितीचे राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे उपस्थित होते. उद्घाटनाला अध्यक्षस्थानी डॉक्टर नंदलाल पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे सहकार्यवाह विश्वजीत चौधरी, जिल्ह्याचे दोन उपाध्यक्ष नाना लामखेडे आणि राजेंद्र बावस्कर जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे उपस्थित होते. सुरुवातीला चळवळीचे गीत सादर होऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी प्रस्तावना केली.
जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, नाना लामखेडे यांच्यासह डॉ. नंदलाल पाटील यांनी त्यांच्या मनोगतमधून, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक जोमाने वाढण्यासाठी शाखांनी कार्यरत राहिले पाहिजे असे सांगितले. शहादा येथे झालेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत विश्वजीत चौधरी यांनी मांडला. जिल्ह्यातील ५ कार्यकर्त्यांना लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार तर २ शाखांना देखील सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच जिल्ह्यातील ३ कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल कौतुक व अभिनंदन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील विविध शाखांनी त्यांच्या कामांचा आढावा घेत अहवाल सादर केला. पुढील काळामध्ये मानसिक आरोग्य दिन सप्ताहाचे उपक्रम, विवेक वाहिनीचे कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील शाखा भेटी आणि नवीन शाखा निर्मितीबाबत नियोजन करण्यात आले.
सूत्रसंचालन जामनेर शाखेचे कार्याध्यक्ष बी. आर. पाटील यांनी केले. आभार जिल्हा महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह शोभा बोऱ्हाडे यांनी मानले. बैठकीला जिल्हाभरातील विविध शाखेतील कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी ॲड. राजू मोगरे, रमेश गायकवाड, जे. डी. पाटील, जाबिर तडवी, सुशीला चौधरी, एन.एस.पाटील, रामदास सोनवणे, भीमराव दाभाडे, तीर्थराज सुरवाडे, बापूसाहेब सुरवाडे आदींनी परिश्रम घेतले.