जिल्हाधिकाऱ्यांकडून वावडदा सरपंचांवर झाली होती कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी निकाल देऊन सरपंच राजेश वाडेकर यांना अपात्र घोषित केले होते. यानंतर राजेश वाडेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे न्यायासाठी धाव घेतली होती. खंडपीठाने मंगळवारी दि. १० जून रोजी निकाल दिला असून सरपंच वाडेकर यांच्यावरील अपात्रतेची कारवाई रद्द केली आहे.
तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचांबाबत तक्रार केली होती. ग्रामसभा न घेणे, खोटे प्रोसिडिंग करणे, आर्थिक गैरव्यवहार करणे असे विविध आरोप तक्रार अर्जात होते. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अर्ज निकाली काढून वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांना अपात्र घोषित केले होते. वावडदा गावचे सरपंच राजेश वाडेकर यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये कारभार चुकीचा केला. पंधरा वित्त आयोगातून केलेल्या कामांचं नियमानुसार वाटप केलेले नाही. तसेच कोणत्याही कामांचे ई-टेंडर केलेले नाही. तसेच शासकीय निधीचा गैरवापर केला असे विविध आरोप तक्रार अर्जामध्ये करण्यात आले होते. सदर तक्रार अर्जावर अनिल आत्माराम पाटील, राजेंद्र रामदास मराठे, राकेश नामदेव भिल, भारती संतोष पवार, रत्नाबाई मुकुंदा पाटील, वर्षा विनोद पवार यांच्या सह्या होत्या.
जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केल्यावर राजेश वाडेकर यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठात सुनावणी होऊन मंगळवारी दि. १० जून रोजी न्या. किशोर सी. संत यांनी निकाल दिला. सरपंच वाडेकर यांचा अपात्रतेची आदेश रद्द केला आहे. तर विरोधी पक्षाने सुप्रीम कोर्टात अपील दाखल करायचे असल्याचे सांगितल्याने त्यांना ४ आठवड्याची मुदत दिली आहे. तोवर उप सरपंच हे कारभार करतील, असेही निकालात न्या. संत यांनी म्हटले आहे.सरपंच वाडेकर यांच्यातर्फे ॲड. चैतन्य धारूरकर यांनी तर विरोधी पक्षाकडून ॲड. विजय पाटील यांनी काम पाहिले.