जळगाव तालुक्यातील वडली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडली येथे एका तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २ जून रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
गणेश अशोक पाटील (वय ४०, रा. वडली ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)त्यांच्यावर सोसायटी व बँकेचे कर्ज होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडता येईल या विवंचनेत ते राहत होते अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यातूनच त्यांनी सोमवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांची पत्नी जेव्हा साडे चार वाजेच्या सुमारास घरी आली त्यावेळी घटना उघड झाली. ग्रामस्थांच्या मदतीने गणेश पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे वडली गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.