प्रत्येक अर्जावर अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश
जळगाव (प्रतिनिधी) : – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आज “सैनिक, माजी सैनिक यांच्यासाठी व परिवारासाठी “सैनिक सेवा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित वीर, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता आणि माजी सैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडला. प्रसाद यांनी सैनिकांच्या पुनर्वसन, पेंशन, आरोग्य सेवा आणि तक्रारींच्या निवारणासंदर्भात सविस्तर चर्चा केली. प्रत्येक अर्जाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. कार्यक्रमात सैनिक कल्याण अधिकारी डॉ. निलेश पाटील आणि अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्रकुमार पाटोळे यांनी अर्जदारांकडून समस्या स्वीकारून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. अनेक वीरमाता व वीरपत्नींनी भावनिक संवाद साधत आपल्या अडचणी मांडल्या, त्यावर तात्काळ प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.