अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविकांच्या सन्मानार्थ भाऊबीज सोहळा उत्साहात
चाळीसगाव (प्रतिनिधी) : आ. मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनतर्फे आयोजित केला जाणारा भाऊबीज सोहळा अखेर मराठी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात उत्साहात संपन्न झाला. तालुकाभरातून उपस्थित असलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या या रक्ताच्या नाही पण दरवर्षी माहेरपण साजरे करणाऱ्या लाडक्या भावाचे औक्षण करत आशिर्वाद दिले. आ. मंगेश चव्हाण यांनीदेखील सर्व बहिणींना साडी भेट देत त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. राज्य शासनाने २०२४ पासून लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची योजना सुरु केली मात्र त्याच्या ४ वर्ष अगोदरच आ. मंगेश चव्हाण यांनी १५०० हून अधिक आशा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी स्वखर्चाने सुरु केलेल्या या भाऊबीज माहेरपण सोहळ्याचे राज्यभरात एक आदर्श पॅटर्नचे म्हणून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
अतिशय अल्प मानधनात कर्तव्य बजावणाऱ्या चाळीसगाव शहर व तालुक्यातील जवळपास १५०० आशा – अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सन्मानार्थ त्यांचा भाऊ या नात्याने सन २०२० पासून आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून या सेविकांना साडी भेट देऊन त्यांचे माहेरपण साजरे केले जाते तसेच त्यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी आ. मंगेश चव्हाण यांच्या वतीने २५ हजारांचा मामाचा आहेर देखील दिला जातो. गेल्या ३ महिन्यात झालेल्या १३ विवाहांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे ३ लाख २५ हजारांचा मामाचा आहेर आजच्या सोहळ्यात सुपूर्द करण्यात आला. आतापर्यंत तालुक्यातील १०४ आशा – अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजारांप्रमाणे २६ लाखांची मदत देण्यात आली आहे.
मी तुम्हाला बहिण मानले आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हीदेखील माझी जबाबदारी असून लवकरच तालुक्यातील सर्व आशा अंगणवाडी ताई यांच्यासाठी संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केली जाईल असे त्यांनी जाहीर केले यासोबतच प्रत्येकाला आपल्या मुलांचे लग्न मंगल कार्यालयात, चाळीसगाव शहरात व्हावे अशी इच्छा असते मात्र परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही त्यासाठी आशा अंगणवाडी ताईंच्या मुला – मुलींच्या लग्नासाठी येणारा मंगल कार्यालयाचा २५ ते ३० हजाराचा खर्च वाचावा म्हणून चाळीसगाव शहरालजवळ खडकी बु येथील ४ ते ५ हजार रुपयात लग्नासाठी मंगल कार्यालय शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमाला माजी आ. साहेबराव घोडे, पोपट भोळे, देवयानीताई ठाकरे, पाचोरा येथील मधू काटे, अमोल पाटील, पारोळा येथील गोविंद शिरुडे, अतुलदादा पवार, के बी दादा साळुंखे, धर्मा आबा वाघ, मच्छिंद्रभाऊ राठोड, वनिताताई विश्वास पाटील, यु डी माळी सर, प्रा. सुनील निकम, नितीन भाऊ पाटील, शेषराव बापू पाटील, संजय तात्या पाटील, धनंजयअप्पा मांडोळे, संगीताताई गवळी, सुलभाताई पवार, भाऊसाहेब जाधव, रवी आबा पाटील, सुभाष पाटील, आशालाताई विश्वास चव्हाण, निलेश महाराज राजपूत, विश्वास चव्हाण, आनंद खरात, प्रा.साधनाताई निकम, मोहिनीताई गायकवाड, मनिषाताई पगारयांच्यासह शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर प्रास्ताविक संगीता गवळी यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रदीप देसले यांनी पार पाडली तर आभार एड.सुलभा पवार यांनी मानले. सोहळ्याच्या सुरुवातीला नुकत्याच कन्नड येथे झालेल्या अपघातातील पातोंडा येथील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपा, शिवनेरी फाउंडेशन पदाधिकारी, अंत्योदय जनसेवा कार्यालय येथील जनसेवक यांनी परिश्रम घेतले.