भुसावळ खून प्रकरणात फिर्यादीतून माहिती समोर
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील गुन्हेगार मुकेश भालेराव याच्या खूनप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे ६ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे प्रत्यक्ष कारण मात्र समोर आलेले नाही.
मुकेश प्रकाश भालेराव (वय ३०, रा. भिलवाडी तापी नदीपात्राजवळ, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृतदेह तापी नदीच्या पात्राजवळून खोलगट भागात पुरलेले अवस्थेत बाहेर काढून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)याबाबत मुकेशचे मोठे भाऊ अविनाश प्रकाश भालेराव (वय ३४, रा. बोरावल खुर्द ता. यावल, हल्ली मु. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मुकेश भालेराव हा त्याचा लहान भाऊ असून तो भिलवाडी तापी नदीपात्राजवळ राहतो. मुकेश याची पत्नी सुरेखा (वय ३०) यांच्यामध्ये कायम वाद होत असे. त्याविषयी मुकेश फिर्यादीला फोनद्वारे सांगत असे. मुकेश याच्यावरील गुन्ह्यांमुळे तो भुसावळ शहरातून तडीपार होता. दि. ७ मार्च रोजी बहिण शोभा गुरचळ यांनी फिर्यादी अविनाश यांना माहिती दिली की, दि. ६ मार्च रोजी भुसावळ येथे काकाचा ढाबा येथे मुकेश याला राखुंडे परिवारातील मनोज राखुंडे व इतर लोकांनी मारहाण केल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला आहे. त्याच्यासाठी जळगाव येथील सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
तेव्हा त्यास भेटण्यासाठी फिर्यादी अविनाश हे पुणे येथून जळगावला आले होते. त्यावेळेला मुकेशने फिर्यादीला सांगितले की, मनोज राखुंडे व त्याच्या घरातील दोन-तीन जणांनी त्याला मारहाण केली आहे व तुला जिवंत सोडणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. फिर्यादी मोठ्या भावाने त्यावेळेला मुकेशला त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दे असे सांगून पुणे येथे निघून गेले होते.(केसीएन)अधून मधून मुकेशचा फोन येत होता की, मनोज राखुंडे व त्याचे साथीदार मला मारणार असल्याबाबत समजले आहे. तेव्हा फिर्यादीने, तू भुसावळ मध्ये थांबू नको. कुठेतरी बाहेर जा असा सल्ला दिला. दि. २१ मार्च रोजी दुपारी फिर्यादीची बहीण शोभाबाई हिने अविनाश भालेराव यांना फोनद्वारे सांगितले की, होळीच्या रात्री संशयित आरोपी मनोज राखुंडे, जितू भालेराव, शुभम राखुंडे, विकास राखुंडे, सौरभ सोनवणे, रोहन तायडे यांनी घरात येऊन मुकेशला मारहाण करून सोबत घेऊन गेले आहेत व अद्याप पर्यंत मुकेश परत घरी आलेला नाही, असे मुकेशची पत्नी सुरेखा हिने आम्हाला सकाळी सांगितले.
त्यामुळे फिर्यादी अविनाश हे लगेच भुसावळ येथे आले. तेव्हा मुकेश भालेराव याचे प्रेत ट्रामा केअर सेंटर येथे शवविच्छेदनासाठी आणल्याची माहिती मिळाली. डॉक्टरांकडून फिर्यादी अविनाश यांना कळाले की, मुकेशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राचे वार दिसत आहे. फिर्यादी अविनाश यांना त्यांचे वडील व भाऊ यांनी सांगितले की, मुकेशला होळीच्या दिवशी त्याच्या घरात घुसून संशयित आरोपी मनोज राखुंडे, जितू भालेराव, विकास राखुंडे, रोहन तायडे आणि इतर दोन अल्पवयीन तरुणांनी मारहाण करून चाकू, सुरे, बंदुकीने जीवे ठार मारले व त्याची बॉडी घेऊन गेले असल्याचे सुरेखा हिने सांगितले असे फिर्यादीत नमूद आहे. तसेच २१ मार्च रोजी मनोज राखुंडे यांच्याकडे भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास करून त्याला घेऊन जात मारुती नगराच्या मागच्या जंगलात खोदले असता त्या ठिकाणी मुकेश याचा मृतदेह मिळून आला आहे.
त्याच्या शरीरावर वार दिसत असल्याने फिर्यादी अविनाश यांचे भाऊ शिवाजी यांनी माहिती दिली. त्यामुळे फिर्यादी अविनाश भालेराव यांनी संशयित आरोपी मनोज राखुंडे, जितू भालेराव, विकास राखुंडे, रोहन तायडे आणि इतर दोन अल्पवयीन तरुणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान भुसावळ मध्ये पुन्हा खुनाची घटना उघडकीस आल्यामुळे भुसावळ शहर पुन्हा चर्चेत आले आहे