पाचोरा-भडगावचे आ. किशोर पाटील यांची माहिती
पाचोरा (प्रतिनिधी) : सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनातर्फे पाचोरा भडगाव मतदार संघातील ८६ हजार ७३३ शेतकर्यांना सुमारे १०० कोटी रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर हा निधी पडणार आहे. येणारा गुढी पाडवा हा या नुकसानग्रस्त शेतकर्यांंना गोड जाणार असल्याची माहीती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपाचे मधुकर काटे, सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, किशोर बारवकर, सुनिल पाटील, गंगाराम पाटील, राजेंद्र पाटील, प्रविण ब्राम्हणे, संजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. किशोर पाटील म्हणाले की, राज्यात आपत्ती निधीच्या नियमानुसार, पाचोरा तालुक्यातील ६६. ७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ५२ हजार ३६४ शेतकऱ्यांना एकूण ६९ कोटी ४५ लाख २२ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर भडगाव तालुक्यातील २२ हजार १००. १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३४ हजार ३६९ शेतकऱ्यांना एकूण ३० कोटी ५ लाख ६२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
शेतकर्यांना हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी. बी. टी. पोर्टलद्वारे वितरित केले जाणार आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शेतकऱ्यांची बँकनिहाय व आधार क्रमांकानुसार यादी तयार करत आहेत. अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी “आपले सरकार” केंद्रात जाऊन तत्काळ ई – केवायसी करावी, जेणेकरून निधी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल. शासनाने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभारही आ. किशोर पाटील यांनी मानले.