मयत जळगावच्या पिंप्राळ्यातील रहिवासी, वरणगावजवळ घडविली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : कोमात असलेल्या जळगावच्या तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणी फाट्याजवळील साईबाबा मंदिराजवळ खून करून दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवून संशयित आरोपींची यानंतर विम्याचे ८३ लाख आणि दुचाकीच्या विम्यावरून १५ लाख असे ९८ लाख रुपये लाटल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव येथील दोघे व एरंडोल येथील एक अशा ३ जणांना अटक करण्यात आली. मृताच्या चुलत बहिणीने नाशिक आयजींकडे तक्रार केल्यानंतर हा उघडकीस आला. यानंतर तिघांवर खुनाच्या गुन्ह्याचे कलमदेखील वाढवण्यात आले.
शरद किसन जगताप (वय ३८, रा. संत मीराबाई नगर, पिंप्राळा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत शरदच्या चुलतबहिणीने याप्रकरणी नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी या प्रकरणात चौकशी केली. (केसीएन)शरद किसन जगताप हे आजारी पडून कोमामध्ये गेले. यावेळी संशयित आरोपी राजू सुभाष गुजारे (वय ४५, रा. न्यू लक्ष्मीनगर, मेहरुण) याने शरद जगताप यांच्या नातेवाइकांना विमा क्लेम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी शरद यांचा दि. २८ मे २०२३ रोजी भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणीजवळील साईबाबा मंदिरालगत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघात झाल्याचे दाखवले.
जळगावचा योगेश वाणी या रुग्णवाहिका चालकाने पोलिसांना मुक्ताईनगरकडून भुसावळकडे येताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसले. त्यात जखमी तरुणाला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्याचा जबाब दिला. पण, तो खोटे बोलत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आपण मुक्ताईनगरहून रुग्णवाहिका घेऊन येत असल्याची बतावणी केली. या अपघातप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खोटी फिर्याद देणारा घनःशाम अमृत सपकाळे (वय २७, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल), जळगाव येथील रुग्णवाहिका चालक योगेश प्रकाश वाणी (वय ३०, रा.गणेशवाडी, जळगाव) यांनी मदत केली.
यानंतर जगताप यांचा १ कोटी रुपयांचा इन्शुरन्स क्लेम करून ८३ लाख व दुचाकी विम्याचे १५ लाख मिळवले. ही रक्कम मृताच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा झाली. पण हे बँक खाते आणि त्याला लिंक असलेला मोबाइल क्रमांक पण राजू गुजारे हा हाताळत होता, असे तपासात समोर आले.(केसीएन)याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी ४ मार्चला राजू सुभाष गुजारे, तर ५ मार्चला घनश्याम अमृत सपकाळे व योगेश प्रकाश वाणी यांना अटक केली. तिघांना भुसावळ न्यायालय हजर केल्यावर पाच दिवसांची दि. ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास वरणगावचे एपीआय जनार्दन खंडेराव, हवालदार एस.जे.सावकारे, मनोहर बनसोडे करत आहेत.