यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथे शेत विहिरीत बक-यांसाठी पाणी भरण्याकरिता गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. विहिरीजवळ बादली आणि हंडा दिसून आला. बुधवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली. तिचा मृतदेह विहिरीत मिळून आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
प्रज्ञा सुरेश साळुंखे (वय २०) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रज्ञा ही मंगळवारी शेत शिवारात त्यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात गेली. बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता जवळच्याच भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली. तेथे हंडा आणि बादली घेऊन ती विहिरीवर पाणी भरत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पाण्यात बुडाली. (केसीएन)मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली आणि हंडा मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले. मात्र काही दिसले नाही. तेव्हा बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात केली.
पोलीस पाटील राकेश साठे, सरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश साळुंखे, प्रशांत कोळी, प्रभाकर साळुंखे यांनी विहिरीजवळ धाव घेतली व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.(केसीएन)यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी तातडीने पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी यांना पाठवले. विहिरीत प्रचंड पाणी असल्यामुळे या तरुणीचा शोध घेण्याकरिता पाण्यात बुडणारे कॅमेरे मागवण्यात आले व ती विहिरीच्या खोल पाण्यात तळाशी असल्याचे दिसून आले. दुपारी दोन वाजता मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.