धरणगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील शेरी येथील ग्रामपंचायत सरपंच विमलबाई देविदास चौधरी यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र साधारण केल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा निकाल मंगळवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी त्यांनी दिला आहे.
धरणगाव तालुक्यातील शेरी येथे अश्विनी नितेश पाटील या रहिवासी आहेत. त्यांनी सरपंच विमलबाई देविदास चौधरी यांच्याविरोधात जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विमलबाई देविदास चौधरी ह्या दि. ५ जून २०२३ रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षित जागेवर निवडून आल्या होत्या. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांना अंतिम दि. १० जुलै २०२४ दिलेली होती. मात्र त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून त्यांचे सरपंच व सदस्यपद रद्द करावे असा अर्जदार अश्विनी पाटील यांनी दिला होता.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, दि. १० जुलै २०२४ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र विमलबाई चौधरी यांनी सादर केलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विमलबाई चौधरी यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे शेरी गावच्या सरपंच म्हणून राहण्यास अपात्र घोषित केले आहे. यामुळे धरणगाव तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.