जालना जिल्ह्यात घडली घटना ; जामनेर तालुक्यातील मजूरही ठार
जाफराबाद (वृत्तसेवा) : टिप्परचालकाने शेडवर वाळू टाकल्याने पत्रा तुटुन आतमध्ये झोपलेल्या पाच बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडली आणि त्यांचा वाळूखाली दबल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास जालना जिल्ह्यातील पासोडी ता. जाफराबाद येथे घडली.
गणेश काशीनाथ धनवई (५०), भूषण गणेश धनवई (१५, दोघे रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र दगडूबा वाघ (४२, रा. दहिद, ता. जि. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (२० रा. पद्मावती, ता. भोकरदन), सुपडू मधुकर आहेर (वय-३८ रा. तोंडापूर, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत. टिप्परचालक संतोष शेषराव कोल्हे (रा. जाफराबाद) व टिप्परमालक गोपाल गवळी (रा. खापरखेडा) यांना जाफराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पासोडी शिवारात भारज-पासोडी मार्गावरील चांडोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. येथे ही दुर्घटना घडली.
बांधकामाच्या शेजारी तयार केलेल्या याच शेडमध्ये मजूर राहत होते. रस्त्याच्या कामासाठी लागणारी वाळू घेऊन आलेल्या टिप्परचालकाने शेडवरच वाळू टाकल्याने ही घटना घडली. वाळूखाली दबून ठार झालेल्या पाच मजुरांमध्ये तोंडापूर ता. जामनेर येथील सुपडू मधुकर जिरी (३८) यांचा समावेश आहे. सुपडू आहेर यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.