चाळीसगाव, भडगाव तालुक्याला फायदा : आ. चव्हाण, आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
जळगांव (विशेष प्रतिनिधी) :- जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळून लाभ होणार आहे.
वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मुळ प्रशासकीय मान्यता दि.०१ मार्च १९९९ रोजी मिळाली. मात्र सन २०१४ पर्यंत प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु होते. सन २०१४-१५ मध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या व प्रकल्पास ०९ मार्च २०१८ रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. (केएसएन)तद्नंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे अर्थसहाय्यक बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये ०१ जानेवारी २०१९ रोजी समावेश करण्यात आला. यानंतर खऱ्या अर्थाने धरणाच्या बांधकामाला गती आली. अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचे (बॅरेजचे) काम मार्च २०२१ रोजी पूर्ण झाले. नियोजित क्षेत्र ८२९० हे. यामध्ये चाळीसगांव तालुक्याचे २० गावे ५६८७ हेक्टर आणि भडगांव तालुक्याचे ११ गावे २६०३ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी प्रस्तावित आहेत.
वरखेडे-लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपारिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता. मात्र यात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२२ मध्ये भाजपा सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी मिळाली. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार व शासनाच्या नविन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले पाईपलाइन प्रणालीद्वारे सिंचन या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या २ वर्षात केवळ चाळीसगावच नव्हे तर भडगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली.
आ. चव्हाण यांनी “केसरीराज” ला पुढे सांगितले की, जुन्या पारंपारिक पद्धतीने पाटचारी झाली असती तर किमान ६ वर्ष फक्त भूसंपादन, पुढील ४ वर्ष बांधकाम असे किमान १० वर्ष पाणी बांधापर्यंत येण्यासाठी लागले असते.याकाळात पारंपारिक कालव्याची ७०० कोटी किंमत दुप्पटीने म्हणजे १४०० कोटी इतकी वाढली असती. यासोबतच धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तामसवाडी गावाचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका होती, यातून मार्ग काढत त्यांच्या मागणीनुसार मालेगाव रोड येथे तामसवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.
या बुडीत क्षेत्राचे भूसंपादन, तामसवाडी पुनर्वसन, गिरणा नदीवर मोठे व छोटे वरखेडे गावाला जोडणारा पूल यासह संपूर्ण प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित होण्यासाठी १२७५ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या २ आठवड्यात देण्याचा शब्द जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आपल्याला दिला होता. हा शब्द आता मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्याने पूर्ण झाला आहे. (केएसएन)त्यामुळे चाळीसगावसह भडगाव तालुक्याला फायदा होणार आहे. यामुळे जनतेने जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांसह आ. मंगेश चव्हाण, आ. किशोर पाटील यांचे आभार मानले आहे.आ. किशोर पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले की, सदर बंदिस्त पाटचारी कामात माझा जरी खारीचा वाटा असला तरी यामध्ये सिंहाचा वाटा आ. मंगेश चव्हाण यांचा आहे. येत्या २ वर्षात प्रत्यक्षात हे पाणी शेत शिवारात खेळेल. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ हाच प्रकल्प नव्हे तर गिरणा खोऱ्याला संजीवनी ठरणारा नार – पार नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु राहणार आहे.