शासनाला दिला आठवड्याचा अवधी
नाशिक (वृत्तसेवा) : महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्यमित्र दि. १२ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दि. ७ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ अण्णासाहेब चव्हाण, डेप्युटी सीईओ मविनोद बोंद्रे, तसेच सहाय्य संस्थेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, उपाध्यक्ष एल. आर. राव, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. गणेश शिंदे, कॉ. किरण ढमढेरे, कॉ. वैशाली साखरे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यावर चर्चा झाली. यामध्ये किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांच्या रजेसह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली.
सहाय्य संस्थेचे पदाधिकारी यांनी आरोग्य मित्र मागण्यासंदर्भात १० दिवसांची मुदत मागितली व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुदत वाढ देऊ असं सांगितले. त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये १० दिवसांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता दि. १७ फेब्रुवारी पर्यंत आरोग्य मित्रांच्या मागण्याबाबत योग्य निर्णय न झाल्यास पूर्वी दिलेल्या नोटीस नुसार दि. १८ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व आरोग्यमित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड यांनी दिली.
०००००००००००००