माळी समाजाच्या वधू – वर परिचय मेळाव्यात जुळले ८ विवाह
जळगाव (प्रतिनिधी) : प्रत्येक समाजाने काळानुसार बदल करून सामाजिक विवाह सोहळ्यात सहभाग घेतला पाहिजे. पतंगाप्रमाणे आयुष्यात तुम्ही कितीही वर जाल, मात्र ज्या समाजाने आपल्याला घडविले, मोठे केले, ओळख दिली, त्या समाजापासून कधीही दूर जाऊ नका, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.
येथील समस्त माळी समाज आणि ‘माळीबंधन’ तर्फे जळगाव शहरातील सरदार पटेल लेवा भवन येथे राज्यस्तरीय वर-वधू परिचय मेळावा दि. २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. राज्यभरातून सुमारे १ हजार समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या मेळाव्यात ८ हून अधिक विवाह जुळले असून ४५० हून अधिक विवाहेच्छुक वधू – वर यांनी नोंदणी करून परिचय करून दिला.
प्रसंगी खान्देश माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संतोष इंगळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य महाजन, मध्यप्रदेश माळी समाज अध्यक्ष विनोद चौधरी, दिनकर महाजन, माजी नगरसेविका सरिता नेरकर, संध्या महाजन, निवेदिता ताठे, अर्चना माळी, नंदू महाजन, सोमनाथ महाजन, शरद मोरे अशोक महाजन, सेवानिवृत्त सपोनि अशोक महाजन आदी उपस्थित होते. प्रारंभी संत सावता माळी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘माळी-बंधन’ या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
माळी समाजाच्या उद्धारासाठी सर्व समाजबंधुंनी एकत्र येण्याची गरज आहे, असे अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष उद्धव माळी यांनी सांगितले. वधू पाल्यांनी वराविषयी अपेक्षा व्यक्त करताना वर निर्व्यसनी आणि मुलीला सांभाळू शकेल, हे दोनच गुण बघा, असे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी गुलाबराव वाघ यांनी सांगितले. संसार करण्यासाठी तडजोड करणे आवश्यक आहे, असे शिवसेना शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी मनोगतात सांगितले. तसेच अमरावती येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन, नाशिकचे उद्योजक कमलाकर चौधरी, उद्योजक हर्षल इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच समाजाच्यावतीने शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांचादेखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माळी समाजातील वधू-वर यांनी परिचय करून दिला. मेळाव्याला गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना आयोजक प्रशांत महाजन यांनी केली. तर सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत महाजन, पवन माळी, मनोज माळी, अमोल महाजन, संकेत चौधरी, स्वप्नील महाजन, चंद्रकांत पाटील, जयंत इंगळे, गणेश महाजन, हरदास महाजन, अनुराग महाजन, प्रभाकर महाजन, प्रवीण माळी आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.