पाचोरा ( प्रतिनिधी ) – आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या कुटुंबाला पाण्यातून गुंगीचे औषध पाजले आणि नंतर लोखंडी रॉडने पती, सासु व सासऱ्यास बेदम मारहाण केली या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु झाला असून या नवविवाहितेचा पहिला नव्हे तर आताच चौथ्यांदा झालेला विवाह होता.
पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी व सेंटिंग काम करणाऱ्या राहुल अर्जुन पाटील याचा विवाह धुळे येथील एजंटामार्फत १ लाख ७५ हजार रुपये देवून पाथरी ( जि- परभणी) येथील साहेबराव सांडु म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला हा विवाह केवळ पैशासाठी झालेला चक्क चौथा विवाह होता हे आता स्पष्ट झाले आहे .
९ मार्चला विवाह झाल्यानंतर आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला घरातील सर्व सदस्यांच्या सतर्कतेमुळे तिला बस स्थानकावरून परत आणलेले होते मात्र तिला करमत नसल्याचे कारणाहुन माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेले वडील साहेबराव म्हस्के यांनी मी तिला माहेरी घेऊन जातो असे सांगितल्यावर सासरच्या मंडळींनी तिला माहेरी नेण्यासाठी नकार दिला होता.
दरम्यान पुन्हा तीन दिवस थांबून साहेबराव म्हस्के व त्याच्या नवविवाहित मुलीने रात्री पळून जाण्याचा कट रचत २८ मार्च रोजी रात्री झोपण्यापूर्वी सासरच्या सर्व लोकांना पाण्यात गुंगीचे औषध देऊन ते सगळे झोपेत असताना पळून जाण्याचा बेत केला होता, सुदैवानं रात्री दिड वाजता वडील व मुलगी पळून जात असताना अर्जुन पाटील यांना अचानक जाग आल्याने त्यानी सुन व व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला त्यांनतर पती राहुल, त्याचे वडील अर्जुन व त्यांच्या आईला लोखंडी रॉडने मारहाण केली त्यात अर्जुन पाटील हे गंभीर जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार घेत असतांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान मारहाण करणारी सुन ही अल्पवयीन असल्याने तिची रवानगी जळगांव येथील बालसुधारगृहात झाली आहे तर तिच्या वडीलांची जामिनावर सुटका झाली आहे.