महिलेसोबत कोणती क्लिप, जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा ‘नाथ’ स्फोट


जळगाव (प्रतिनिधी) – भाजप पक्षाची ओळख तशी शिस्तप्रिय मात्र भरसभेत मारहाणीसह अनेक प्रकरणांनी शिस्तीचे दर्शन जिल्ह्याला यापूर्वीच घडले. यात आता नाथ स्फोट झाला माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका मंत्र्याचा पीए व त्याच्या सोबत असलेल्या एका महिलेच्या व्हिडिओ क्लीपचा उल्लेख एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केला. यामुळे पुन्हा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे करीत विविध चर्चेला तोंड फुटले आहे. वरिष्ठांना पुरावे देऊनसुद्धा जर कारवाई होत नसेल तर भाजपाकडून इतरांना काय अपेक्षा ठेवाव्यात अशाही भावना व्यक्त केल्या जात आहेत.
आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सांगितले. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. आडवे येणाऱ्यांना पाडा या उक्तीनुसार माझ्यासह अनेकांचे टिकटे कापल्याचेही आरोप खडसेंनी केले. गेली चाळीस वर्षाच्या राजकारणात एकही आरोप होत नसताना स्वकीयांनीच षडयंत्र रचत दुसऱ्यांच्या माध्यमातून आरोप केल्याचे ते म्हणाले. यावेळी धक्कादायक माहिती देताना त्यांनी एका मंत्र्याच्या पीए व एका महिलचे वादग्रस्त फोटो व क्लिप असल्याचा स्फोट केला. षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील असल्याचे ते म्हणाले. हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. तसेच एका मंत्र्याच्या पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहीती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले. तो मंत्री आणि त्यांच्याजवळील लोकं कोण याविषयी चर्चा होत आहे. मी काय गुन्हा केला आहे? असे वारंवार विचारतो आहे, असे सांगताना मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी मीच विधानसभेत केल्याची आठवणही खडसे यांनी यावेळी करून दिली
तिकिटांची काटछाट पडली महागात
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे कशासाठी भेट दिली? मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढविला आहे.
मुख्यामंत्रिपदाचा दावेदार म्हणून रचले षडयंत्र
मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला. सन २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे, यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता’, असा दावा खडसे यांनी केला.
मनिष भंगाळे फडणवीसांचे फोटो
भंगाळे-फडणवीस भेटीचे फोटो माझ्याकडे आले होते. माझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे होत असल्याचा आरोप हॅकर मनिष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी मनिष भंगाळे मध्यरात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकर सिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीचे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते. देवेंद्र फडणवीसांनी रात्री दीड वाजता मनिष भंगाळे याला भेटण्याचे कारण काय? असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केला आहे. तेथून मनात शंका आली. त्यानंतर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझिन घेतली, मी एमआयडीसीची जमीन विकत घेतली, असे आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटिंग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालात देखील काही तथ्य नव्हते, असे नमूद करत खडसे यांनी फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
पुरावे देऊनही कारवाई नाही
मी काय गुन्हा केला की तुम्ही मला राजीनामा देण्यास भाग पाडले? माझ्या मुलीला तिकीट देवून तिची हरविण्याची व्यवस्था केली. आमच्याच पक्षातील काही लोकांना सांगून विरोधात प्रचार करायला लावला त्याचे पुरावे देखील चंद्रकांत पाटील व फडणवीसांना मी दिलेत, त्यांनी कारवाई करतो सांगितले. सहा महीने झाले तरी कोणतीही कारवाई केली नाही. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता व मी अशा शंभर टक्के निवडून येणाऱ्यांना तिकीट न देता भाजपने या जागा हातच्या घालवल्या. मुख्यमंत्रिपदाला कुणी आडवे येवू नये म्हणूनच हे उद्योग केले गेले असा आरोप देखील खडसे यांनी केला. या सर्व प्रकाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, या सत्य व पुराव्याच्या आधारे मी एक पुस्तक लिहिणार आहे. त्याचे नाव ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ असे असणार असल्याचेही खडसे म्हणाले.
मी पुन्हा येणार हा अहंकार नडला
मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हा अहंकार होता. ही भूमिका लोकांना आवडली नाही. त्याच जागी जर आम्ही पुन्हा येणार म्हटले असते तर लोकांना आवडले असते. मी येणार मधला मी पणा लोकांना आवडला नाही. याचा परिणाम असा झाला की, भाजप-शिवसेनेचे सरकार येवू शकले नाही. युती नसताना १२३ जागा आल्या होत्या मग आता युती असताना का सरकार आले नाही, याचे उत्तर कोण मागेल? असा सवालही खडसे यांनी केला. मी एकटाच नाही तर भाजपात अनेक नेते अस्वस्थ आहेत. आम्ही कधीही भाजपच्या विरोधात बोललो नाही. केवळ व्यक्ती विरोध केला असेल. आता पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू, वरिष्ठांशी बोलू असेही खडसे यांनी शेवटी सांगितले. तसेच सध्या करोना संसर्ग असल्याने परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर पुढील पाऊल उचलणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.







