पाचोरा ( प्रतिनिधी ) – राज्यातील सत्तांतराचा १५ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदा आज पाचोऱ्यात आलेले आमदार किशोर पाटील यांनी आमच्या आमदारांच्या बंडाच्या कारणांपैकी संजय राऊत हेही एक कारण आहेत असे सांगत संजय राऊत यांच्यावर थेट हल्लाच चढवला .
पाचोऱ्यात माध्यमांशी बोलताना आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की , आता आम्ही नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत . आम्ही आल्यावर शिवसेनेला कधीच आतापर्यंतच्या इतिहासात २५ हजारांपेक्षा जास्त मतदान मिळालेले नाही . कधीही आमदार पुन्हा पुन्हा निवडून आलेले नव्हते . माझे काकासाहेब २ वेळा व मी २ वेळा शिवसेनेमुळेच निवडून आलो कारण आम्ही प्रेमाने आणि विश्वासाने माणसे जवळ केली . आता मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिष्य म्हणून आणि माझे विश्वासू समर्थक माझ्यासोबत एकनाथ शिंदे यांचाच प्रत्येक निर्णय मान्य करतील , ही भूमिका आम्ही खूप काळजीपूर्वक घेतली आहे . अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी नगरविकास खात्याचा एकूण आकडा फक्त सांगितला पण आम्हाला किती मिळाले हे सांगितले नाही किंवा ते सांगू शकले नाहीत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले , त्यापूर्वी त्यांना कोणत्याच सत्तापदाचा किंवा संवैधानिक पदावरच्या कामाचा अनुभव नव्हता , याचाच फायदा राष्ट्रवादीने आणि अजित पवारांनी घेतला आणि उद्धव ठाकरे यांना खाचाखोचा माहिती नसल्याने आपला छुपा अजेंडा राबवला . कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा ४० वर्षांचा अनुभव होता . येथे हा फरक पडला , असेही ते म्हणाले .