जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारातचा बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील समतानगरातील रहिवासी जुबेदाबी या त्यांचा मुलगा कामील बेग याच्यासोबत सावदा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. साखरपुडा आटोपून मायलेक दुचाकी (एमएच १९, डीएक्स ८१५८) वरून मंगळवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचला जळगावला येण्यासाठी निघाले होते. समोरून येणाऱ्या (एमपी ०९, एमझेड ७६३७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. कामीलच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची आई जुबेदाबी महामार्गावर फेकल्या गेल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्या गेल्याने त्या जागीच ठार झाल्या होत्या. तर कामील अल्ताफ बेग (वय-२०) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या वर डॉ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वाजता कामील अल्ताफ बेग यांची देखील प्राणज्योत मालवली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.