जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. यातील पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर आहे. दोघेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आर्थिक विवंचनेतून तिघांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वडली गावात नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील (वय-५५) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय-३३) याच्यासोबत राहत होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात होते. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले. त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले.
त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिघांपैकी नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी ११ वाजेसुमारास मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तिघांनी अचानकपणे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.