अमळनेर (प्रतिनिधी) – जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानांमध्ये साठ्याची अनियमितता व इतर कारणांमुळे तालुक्यातील तीन गावांमधील दुकानांचे परवाने अखेर रद्द केले आहे. रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराला यामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कारवाई झालेली दुकाने भिलाली, एकलहरे आणि भरवस येथील आहे. तत्कालिन तहसीलदार मिलिंद वाघ आणि गोदाम व्यवस्थापक अनिल पाटील यांच्या काळात या दुकानांच्या चौकशा झाल्या होत्या. एकलहरे, भरवस आणि भिलाली येथील रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप शासकीय नियमनुसार न करता त्याचा साठा करून ठेवला होता. याबाबत तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यात भिलाली येथील दुकान क्रमांक ८४ येथे ४.६१ क्विंटल गहू व २१.७९ क्विंटल तांदूळ, एकलहरे येथील दुकान क्रमांक ८२ येथे १०.१७ क्विंटल गहू आणि १.८७ क्विंटल तांदूळ, भरवस येथील दुकान क्रमांक ६९ मध्ये १५.८८ क्विंटल गहू आणि ३१.७ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला होता.
दुकानांचा रितसर पंचनामा करण्यात आला. यात दुकानदारांनी साठवून ठेवलेला हा माल त्यांनी लाभार्थ्यांना वाटप न करता त्याचा साठा केल्याचे उघड झाले. याबाबातच अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जळगाव येथे सुनावणी घेतली. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. तालुक्यातील संबंधित दुकानांची १० मार्च २०२२ ला चौकशी करण्यात आली होती. यात लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत नसणे, दुकानात भावफलक नसणे, हिशोब रजिस्टर तसेच उचल व शिल्लक साठा यात तफावत आढळल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दुकानांवर कारवाई केली आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल पाटील यांनी दिली.