“विवाह” हिंदू धर्मीयांत पवित्र संस्कार आहे विवाहामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्यात बांधले जातात. म्हणूनच या नात्यास लग्नगाठ म्हणतात. वधू वर पसंती ते मुलीची पाठवणी अशा अनेक विधिंचं कोंदण लाभलेला प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येणारा हा अद्वितीय संस्कार!
कालानुरूप विवाह सोहळ्यात आणि विवाह पद्धतीत बदल झाले. जेवणाच्या पंगतींची जागा बुफेनं घेतली सनई-चौघडा यांची जागा ऑर्केस्ट्रा आणि डीजेनं घेतली लग्न सोहळ्याच्या आठवणी फोटोत साठवण्याऐवजी विडिओ कॅसेट आणि सिडी आल्या . आज विवाहानंतर सुरू होणाऱ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात विवाहपूर्वीच करणारा आधुनिक पण संवेदनशील मनाला अंतर्मुख करायला लावणारा नवीन ट्रेंड, संस्कार या गोंडस नावाखाली सर्रास सुरू झालाय…प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ शूट
लग्नापूर्वीच वधू-वर कुटुंबीयांच्या संमतीने ,छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन , फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून घेतात.विवाहाच्या नात्यात असणारी ओढ याच क्षणी काहीशी नष्ट केली जाते. मुळातच मोबाईलमुळे विवाहापूर्वीच वधू-वरांमध्ये अधिक जवळीक निर्माण होत असली तरी पूर्वी विवाहापूर्वी वधू आणि वर यांच्यात विवाहापर्यंत असलेला दुरावा आणि त्या दुराव्यात असणारं कुतूहल आणि त्यातूनच पती-पत्नीच्या नात्यात निर्माण होणाऱ्या प्रेमाला काहीशी ओहोटी लागली आहे नाविन्याची ओढ काहीशी संपलेली दिसून येते.
प्रि वेडिंग फोटो आणि व्हिडिओ शूटसाठी लाखो रुपये मध्यमवर्गीय पितादेखील खर्च करताना दिसून येतो खरंच प्री-वेडिंग फोटो आणि प्रि व्हिडिओ शूट आवश्यक आहे का ?, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. विवाह पद्धतीत कालानुरूप बदल होणे आवश्यक असले तरी ते समाजासाठी पोषक असणे आवश्यक आहे. प्री-वेडिंग च्या निमित्ताने वधू आणि वर यांच्यासमवेत जाणारा छायाचित्रकारांचा ग्रुप आणि बॉलिवूडचा प्रभाव दर्शविणारे वधू-वरांचे केले जाणारे हिडीस आणि ओंगळवाणे प्रदर्शन कोणत्याही संवेदनशील मातापित्यालाच नव्हे तर कुटुंबाला विचार करायला भाग पाडते.
प्री-वेडिंग शूटिंगच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या आणि एकांत लाभलेल्या वधू-वरांमध्ये मतभेद होऊन विवाह मोडल्याच्या घटनादेखील अनेकदा वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. या पद्धतीने विवाह होण्यापूर्वीच वधूला नाकारले जात असेल तर तिच्या भविष्याचे काय हा देखील प्रश्न निर्माण होतो. समाजात प्री वेडिंग शूटिंगच्या निमित्ताने नाकारल्या गेलेल्या मुलींची आणि त्यांच्या कुटुंबांचे काय अवस्था होत असेल याचा गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. विवाहासाठी उपस्थित अनेकांच्या जितक्या सकारात्मक असतील तितक्याच नकारात्मक देखील प्रतिक्रिया अनुभवायला मिळतात. ग्रामीण भागात देखील हळूहळू प्री वेडिंग शूटिंगचे लोण पसरायला सुरुवात झाली असून वेळीच सुज्ञ पालकांसोबतच समजदार वधू-वरांनीदेखील याचा विचार करायलाच हवा. ज्या गोष्टी विवाहानंतर सहजशक्य आणि समाजमान्य आहेत त्याच गोष्टी विवाहापूर्वी करून केवळ मोठेपणा मिळवण्यासाठी या गोष्टी केल्या जात असतील तर निश्चितच स्वागतार्ह नाही.
पती-पत्नी आणि यांच्यातली जवळीक नाजूक भावना , केवळ त्यां दोघांमधीलच आंतरिक गुपित असून ती प्रदर्शन मांडण्याची गोष्ट नाही. म्हणूनच यावर केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च वधू-वरांच्या भविष्यासाठी वापरला गेला तर निश्चितच चांगली सुरुवात होऊ शकते. केवळ वधूवरांच्या हट्टासाठी आई-वडिलांकडून प्री वेडिंग शूटिंग आणि फोटोला परवानगी दिली जाते त्यातूनच अनेकदा दोन्ही कुटुंबांना मानहानी देखील पचवावी लागते. केवळ कुटुंबाची श्रीमंती दाखवण्यासाठी हा खर्च केला जात असेल तर नंतर टिंगल टवाळी करणारेदेखील असतातच
लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं…
संजय ओंकार वाघ
( चेअरमन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था,पाचोरा )