जात प्रमाणपत्र वैधता सिद्ध न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील खर्ची बुद्रुक येथील सरपंच गोपाळ माळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे . त्यांनी जात प्रमाणपत्राची वैधता विहित मुदतीत सिद्ध न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० -१ ( अ ) नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. खर्ची येथील पोपट माळी २४ फेब्रुवारी रोजी सरपंच गोपाळ माळी यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. ११ डिसेंबर २०१८ रोजी गोपाळ माळी सरपंचपदावर निवडून आले होते. गोपाळ माळी यांना १६ सप्टेंबर आणि १७ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती, मात्र ते सुनावणीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर जिल्हधिकाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी संपवण्याचा निर्णय घेतला होता.
गोपाळ माळी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च आणि उच्चं न्यालयाच्या यापूर्वीच्या निर्णयांच्या अधीन राहून हा निर्णय जारी केला असल्याचे म्हटले आहे . निवडून आल्याच्या तारखेपासून संबंधितांनी ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे कायद्यानुसार बंधनकारक असते.
आता जोपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर करत नाही. किंवा जिल्हाधिकारी यांचा निकाल रद्द होत नाही. तोवर पुढील निवडणूक लढवण्यास ही अपात्र राहतील.







