मुंबई (वृत्तसंस्था) – बेळगाव वादावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात राजकीय वातावरण तापले असतांना, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई कर्नाटकचा भाग असल्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी सावदी यांनी केली. या वक्तव्यामुळे राज्यात तीव्र राजकीय प्रतिसाद उमटत आहे. महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षात बसलेल्या भाजपला घेरलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर टीका केली असून, ‘महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे आता कुठे गेले?’ असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत मोठ्या संख्येनं कानडी भाषिक राहतात. त्यामुळे मुंबई शहराला कर्नाटकाशी जोडावे अशी कानडी भाषिकांची भावना आहे. जोपर्यंत ही मागणी पुर्ण होत नाही. तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावे अशी मागणी सावदी यांनी केली आहे. त्यावर आता काँग्रेस आक्रमक झाली असून, भाई जगताप यांनी सावदी यांच्यासह देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ‘सावदी हे कर्नाटकातील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत. या पदावरच्या व्यक्तीनं असं निरर्थक विधान करणं निषेधार्ह आहे. त्यानी असे वक्तव्य करतांना किमान अक्कल वापरायला हवी. ज्या महाजन समितीच्या अहवालाला संदर्भ देऊन सावदी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करतात. तो अहवाल बेळगावासह सीमाभागाशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या असलेले प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे’ असे जगताप म्हणाले. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व त्यांचे चमचे एरवी मोठमोठ्या गप्पा मारतात. त्यांना सावदी यांच वक्तव्य खटकलं कसं नाही? अशी टीका जगताप यांनी फडणवीसांवर केली.