जळगाव (प्रतिनिधी) – कानळदा रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका शेतकऱ्याच्या उभ्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बैलगाडीला जोडलेली २ बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हि घटना शुक्रवारी ३ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता.
जळगाव कानळदा रस्त्याच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंग जवळ दगडू राजाराम धनगर रा. आव्हाने ता. जळगाव यांचे शेत आहे. शुक्रवार ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले. त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते.
दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणाऱ्या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता.
यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.