श्रीनगर ( वृत्तसंस्था ) – काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगमुळे पंडित आता खोरे सोडून जात आहेत. पंतप्रधानांच्य़ा मदतीतून उभी राहिलेली अनंतनाग येथील काश्मिरी पंडितांच्या कॉलनीत भीषण शांतता आहे. इथे एका काश्मिरी पंडितांने दिलेल्या माहितीनुसार कॉलनीतील 90 टक्के काश्मिरी पंडितांनी त्यांची घरे सोडली आहेत.
लोकांच्या संयमाचा बांध आता तुटला आहे. त्यामुळे रात्रीतून घरे सोडत काश्मिरी पंड़ितांनी पलायन केले आहे. ही कॉलनी पंतप्रधानांच्या पॅकेजतर्गत तयार करण्यात आली होती. इथे काश्मिरी पंडित समुदायातील सरकारी कर्मचारी राहत होते. काही दिवसांपासून खोऱ्यात सुरु असलेल्या हत्यांच्या सत्रामुळे अनेकांनी कॉलनीतील घरे सोडून, इतर गावी प्रस्थान केले आहे. परिस्थिती सुधारली तरच ते परततील अशी आशा आहे.
अनंतनाग आणि कुलगाममधील काश्मिरी पंडितांनी स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरुच आहे. जोपर्यंत सुरक्षेची योग्य उपाययोजना होत नाही तोपर्यंत पडितांनी या ठिकाणाहून हलवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
टार्गेट किलिंगची वाढती व्याप्ती आणि धोका लक्षात घेता, काश्मीरात येत असलेल्या प्रवाशांना आणि जम्मू परिसरातील इतर क्रमचाऱ्यांना ६ जूनपर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला आहे.
काश्मीरमध्ये यावर्षी दहशतवादी हल्ल्यात 20 नागरिकांची हत्या करण्यात आली यातील 9 हत्या 22 दिवसांतील आहेत. यात 5 हिंदू आणि 3 सैन्यदलातील कर्मचारी आहेत. हे जवान सुट्टीवर घरी परलेले असताना त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांनी एका टीव्ही एक्टरचीही हत्या केली आहे. काश्मनीर फ्रीडम फायटर या संस्थेने प्रसिद्धीपत्रक जारी करत, सगळ्यांना असेच परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे.
1990 साली खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे सर्वाधिक पलायन झाले होते. गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, 1990 मध्ये 219 काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंडितांचे पलायन सुरु झाले. एका अनुमानानुसार 1 लाख 20 हजार काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून त्यावेळी पलायन केले होते.