मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव यानं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेचे पात्रता निकष पूर्ण करून इतिहास घडवला. टोक्योत यावर्षी होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावणारा तो पहिला भारतीय जलतरणपटू ठरला. आतापर्यंत देशातील कोणत्याच जलतरणपटूनं २०२१च्या पॅरालिम्पिक व ऑलिम्पिक स्पर्धेचे पात्रता निकष पूर्ण केलेले नाही. सुयश ५० मीटरच्या S-7 कॅटेगरी आणि २०० मीटर वैयक्तिक मीडलेच्या SM-7 कॅटेगरीत सहभाग घेणार आहे. त्यानं २०१८मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेच्या कामिगिरीच्या जोरावर पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवला.

५० मीटर बटरफ्लाईच्या पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी त्याला ०.३२.९० सेकंदापेक्षा कमी सेकंदात शर्यत पूर्ण करायची होती आणि त्यानं जकार्ता येथील स्पर्धेत ०.३२.७१ सेकंदाची वेळ नोंदवली आणि सुवर्णपदक जिंकले. तेच २०० मीटर मीडले प्रकारात त्याला २.५७.०९ सेकंदाची वेळ नोंदवायची होती आणि त्यानं २.५६.५१ सेकंदात हे अंतर पूर्ण केले. तो सध्या पुण्यातील बालेवाडीच्या भारतीय प्राधिकरण क्रीडा केंद्रात सराव करत आहे. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.
सुयशचे वडिलही राज्यस्तरीय जलतरणपटू आहे. ११ वर्षांचा असताना सुयशला एका अपघातात हात गमवावे लागले. पण, त्यानं वडिलांचे स्वप्न पूर्ण करून जलतरणात नाव कमावलं. मागील वर्षी त्याला अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले.
”माळशिरस तालुक्यातील वेळापूरचे सुपुत्र, जलतरणपटू सुयश जाधव यांची टोकियो येथे होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर जागतिक व्यासपीठावर सोलापूरचे नाव उज्वल करणाऱ्या सुयश जाधव यांचा मला अभिमान वाटतो,” असे ट्विट राज्यमंत्री दत्तात्रय भारणे यांनी केलं आहे.







