जामनेर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या पिकाला दाम नाही. तसेच, कापसालाही भाव मिळत नसल्याने युवासेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी २९ रोजी जामनेरात कापसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शेतकऱ्यांचा अंत न पाहता शासनाने कापसाला भाव द्यावा, अन्यथा दहा दिवसानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
जामनेरातील नगरपालिका चौकात कापसाची तिरडी तयार करून चार कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतली. कापसाला भाव मिळाला पाहिजे, भाव देणे शक्य नसेल तर पेरणीसाठी प्रति एकर ५ हजार अनुदान द्यावे, शासनाने शेतकऱ्यांचा विमा काढावा, बाजार समितीत हमी भावाने शेती मालाची खरेदी करावी, अशा विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले आहे. प्रसंगी नाकर्त्या राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवासेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, विशाल जंजाळ, भैया गुजर, अतुल सोनवणे, सुरेश चव्हाण, मनोज मिस्तरी, सईद शेख, मयूर पाटील, अनिल चौधरी, भूषण कानळजे, योगेश गोसावी, सागर साठे यांचेसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.