मुंबई (प्रतिनिधी) – आज नवीन संसदेचं उद्घाटन झालं. तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मी तिथे गेलो नाही याचं मला समाधान वाटलं. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतले नाही. संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन करावे, हे सुद्धा मान्य करण्यात आले नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आमची बांधिलकी जुन्या संसदेशीच आहे, जुन्या संसदेसोबत आमच्या भावना जुळल्या आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन संसद उद्घाटन कार्यक्रमावर टीका केली. ज्या लोकांची तिथे उपस्थिती होती, जे काही कर्मकांड तिथे सुरू होतं, ते पाहिल्यानंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवारहलाल नेहरूंनी मांडली होती आणि आताचा हा कार्यक्रम यामध्ये फरक आहे. यामुळे आपण काही वर्षे पाठीमागे गेलो की काय, अशी स्थिती आहे.
नेहरूंची आधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सातत्याने होती. आजच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती-उपराष्ट्रपती उपस्थित नव्हते. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, असं पवार यांनी म्हटलं.
नव्या संसदेचा सोहळा काही लोकांपुरताच आहे. एवढा मोठा निर्णय घेताना कोणतीही चर्चा झाली नाही, अशी टीका पवार यांनी केली. वास्तुपूजन, राजदंड स्थापना आणि सर्वधर्मीय प्रार्थना घेऊन नवी दिल्ली येथे बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचे उदघाटन झाले.