जळगाव ( प्रतिनिधी ) – शिंदे गट आणि भाजपचे सरकार अस्तित्वात येण्याचे संकेत मिळत आहेत . त्या पार्शवभूमीवर शिंदे गट – भाजप सरकारमध्ये मंत्रीपदे जिल्ह्यात कुणाला ? ; चिमणराव पाटील की किशोर पाटील ? , हा नवा मुद्दा चर्चेत आहे .
हे नवे सरकार अस्तित्वात आल्यावर जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचे कॅबिनेट मंत्रिपद पक्के आहे , त्याबद्दल कुणालाही शंका नाही . मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या अन्य नावांची चर्चा सुरु झाली आहे . या शर्यतीत आता पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना महत्व आले आहे .
पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ आहे . ते पक्षाशी प्रारंभापासून एकनिष्ठ आहेत . पक्षासाठी काम करताना शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांशी हितसंबंध विकसित झाले आहेतच . त्यांची कामाची पद्धत आणि स्वभाव कुणाला न दुखावता कामावर भर देण्याचा आहे . ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी ते स्थानिक राजकारणातही थेट कधी भिडलेले नाहीत . लोकप्रियतेसाठी माध्यमांसमोर बोलणे त्यांनी कधी केले नाही . सध्या ते गुवाहाटीत असले तरी त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी गेल्या ६ दिवसात समाज माध्यमांमधून त्यांचे काही फोटो अथवा व्हिडीओ व्हायरल केलेले नाहीत . राजकारण आणि कामाचा मोजका गोतावळा सांभाळत राजकीय डावपेच आखण्यात माहीर आहेत . प्रशासनाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे
पाचोऱ्याचे आमदार सध्या दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे आमदार आहेत . त्यांचे काका दिवंगत आर ओ पाटीलही शिवसेनेचे आमदार होते . किशोर पाटील यांनाही शिवसेनेचा प्रदीर्घ वारसा आहे . पक्ष संघटनेचा आणि प्रशासनाचा अनुभव मोठा आहे . प्रसंग पाहून विरोधकांशी जुळवून घेणे किंवा आपला हेतू पूर्ण करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करणे अशी त्यांची कामाची पद्धत आहे . पक्षासाठी काम करताना शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांशी हितसंबंध विकसित झाले आहेतच . त्यातच एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांचा सलोखा काही महिन्यांपूर्वीच तालुक्याने पाहिलेला आहे . पाचोरा तालुक्यात त्यांचे काका आर ओ पाटील यांनी त्यांच्या काळात शिवसेना मेहनतीने वाढवलेली आहे . त्यामुळे त्यांची मंत्रिपदाची महत्वाकांक्षा वाढलेली दिसणे स्वाभाविक आहे .
मध्यंतरी गुवाहाटीत मंत्रिपदावरून मतभेद झाल्याने बंडखोर आमदारांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाल्याची चर्चा रंगली होती . ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांचाही मंत्रिपदाचा दावा मजबूत असताना जिल्ह्याच्या वाट्याला किती आणि कोणत्या खात्यांची मंत्रीपदे येतील ? , जी मंत्रीपदे जिल्ह्यातील आमदारांना मिळतील त्यात कॅबिनेट कोण असेल ? आणि राज्यमंत्री कोण असेल ? , या मुद्द्यावर तर्क – वितर्क लढवले जात आहेत .
जिल्ह्यातील दुसऱ्या आमदार लता सोनवणे यांच्याबाबत मात्र अशी मंत्रिपदाची चर्चा नाही . लता सोनवणे यांचे नाव अपात्र ठरवावे म्हणून शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या १६ आमदारांच्या यादीत आहे .