मुंबई ( प्रतिनिधी ) – दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव या वर्षी धडाक्यात साजरा होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची आणि नियमांचे बंधन राहणार नाही.
मूर्ती पर्यावरणपूरकच राहणार आहे. याबाबत शिवसेना आणि गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे 2020 मध्ये “पीओपी’च्या मूर्तीवर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी सुमारे 150 हून जास्त कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. या तलावात 2 फुटांच्या मूर्तींचे विसर्जन करणे सोयिस्कर ठरते. त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांच्याच कराव्यात असे आवाहन आणि विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची विक्री किंवा खरेदी करू नये असे आवाहनही पालिकेने केले आहे.
शाडू माती पर्यावरणपूरक आहे, कोणत्याही घातक रसायानाचा अंश या मातीत नाही. त्यामुळे या मूर्तीचे विघटन अतिशय सोप्या पध्दतीने होते. मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणताही रासायनिक वा जैविक प्रभाव जलस्त्रोतावर होत नाही.