मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतांतर असून उघडपणे नाराजी जाहीर करण्यात आली आहे. सरकारमधील काँग्रेसचं स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात.
तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातही अनेकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
‘काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील.त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही,’ असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी बोलताना नाना पटोलेंनी सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली. ‘आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे’, असं ते म्हणाले आहेत.







