नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे. यावर्षी मान्सून वेळेत येणार असून चांगला राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मान्सून चांगली हजेरी लावणार असल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनची हजेरी चांगली राहणार असल्याने यंदा दुष्काळाचे सावट नसणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खाते हे त्यांच्या अचूक अंदाजासाठी जगात ओळखले जाते. यंदा मान्सूनने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली तर गेल्या तीन वर्षात शेतीचे झालेले नुकसाना काही अंशी भरून निघेल
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी भारतातील हवामान खात्याकडून अजूनपर्यंत असा कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या नंतर आता एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज वर्तवला जाण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला तर देशातील अनेक शेतकरी सुखावणार आहेत. मागील वर्षीही देशाबरोबरच राजयातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोरोनामुळे काही दिवसांपासून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता.